पुस्तकायन

Thursday, June 29, 2006

आनंदी आनंद गडे!

वाचनालयाच्या कोपऱ्यात दुर्लक्षिलेली अनेक पुस्तके असतात. अनेकदा या घुळीतही माणकं सापडतात. एकदा मी असं ठरवलं होतं की काही काळ अनुवादित पुस्तकंच वाचायची. आमच्या ग्रंथालयातल्या काकांचं माझ्यावर सुपर लक्ष असायचं. मी चुकून मिल्स ऍन्ड बून्स तर वाचत नाहीये ना याकडे ते लक्ष ठेवून असायचे. "आपल्या डोळ्यांसमोर लहानाच्या मोठ्या झालेल्या या मुलीला चांगली संस्कारक्षम आणि कसदार साहित्याने परिपूर्ण पुस्तकं वाचायला मिळावीत " असा थोर हेतू त्यामागे होता हे मला माहीत असल्यामुळे मलाही त्यात वावगं असं काहीच वाटलं नाही (याचा अर्थ मी मिल्स ऍन्ड बून्स वाचलीच नाहीत असा मात्र नाही.. पण ती वेगळी कथा आहे... पुन्हा केंव्हातरी :) )
तर ग्रंथालयातल्या काकांनी माझ्यासाठी खास आतलं सगळं कपाट मोकळं केलं होतं. पण मला मनासारखं पुस्तक काही मिळत नव्हतं. तेंव्हाच एका जीर्ण शीर्ण पानांचे तुकडे पडू लागलेल्या पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. पुस्तकाचं नाव होतं "आनंदी आनंद गडे" भाषांतर केलं होतं भा. रा. भागवतांनी. खरं म्हणजे त्यात सांगण्यासारखी काही कथाच नाही. आता उद्या कोणी तुम्हाला सांगितलं की साथिया सिनेमाची 'स्टोरी' सांगा तर तुम्ही म्हणालच ना की त्यात काय सांगायचंय कप्पाळ! भातुकलीची गोष्ट दुसरं काय... या पुस्तकाचं पण तसंच आहे. पण मधूनच इतकं सरळ साधं वाचलं की कसं हलकं हलकं वाटतं... तर ही गोष्ट आहे एका मुलीची. दीडेकशे वर्षांपूर्वीची असावी. एक सतरा - अठरा वर्षांची अमेरिकन मुलगी. लॉर्ना तिचं नाव. घरचं वातावरण जाम मर्मठ. वडील धर्मोपदेशक. अमेरिकेच्या डोंगराळ भागात निसर्गाशी दोन हात करत करत नीतीबंधनं पाळून सदाचाराने आयुष्य जगणारं ते एक कुटुंब. चार मैल अंतर चालून शाळेत जाणारी लॉर्ना. तिला असलेली ज्ञानलालसा तिला थंडीवाऱ्याची पण पर्वा करू देत नसे. घरची सगळी कामं सांभाळून ती शिकत होती. अशा वेळीच घरची आर्थिक चणचण दूर करण्याची एक संधी तिच्यासमोर चालून आली. दोन तास अंतरावरच्या एका गावातल्या शाळेत तिला शिक्षिकेची नोकरी . मिळाली. याचा अर्थ आता शाळेत जाऊन शिकण्यावर पाणी सोडणे हा होता.. लॉर्ना याला तयार झाली. त्यांच्या घराजवळ राहणारा अल्बर्ट गाडीवाला तिला आपल्या घोडागाडीतून दर सोमवारी तिच्या नोकरीच्या गावी सोडायचा आणि शनिवारी संध्याकाळी परत घेऊन यायचा.
शाळेत शिकवतानाही तिने आपला अभ्यास सुरू ठेवला होता. तिच्या विद्यार्थ्यांमधे एक तिच्यापेक्षाही मोठा मुलगा होता. त्याचे आणि तिचे सुरुवातीला खटके उडायचे. पण लौकरच लॉर्नाचा सरळ साधा स्वभाव, तिची अंगभूत हुशारी आणि तिचा कष्टाळूपणा सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ लागला. ती कशी सतत अभ्यास करते,क्षणभरही वेळ वाया न घालवता सगळा वेळ सत्कारणी लावते, तिला इतिहास - भूगोलातल्या कितीतरी अद्भुत गोष्टी कशा मुखोद्गत आहेत, लॅटिन भाषेचं तिचं व्याकरण कसं पक्कं आहे, गणिते ती कशी पट्कन सोडवते, तिची भाषा कशी स्वच्छ - शुद्ध असते याची चर्चा तिच्या पाठीमागे होऊ लागली. "ही कोण आपल्याला शिकवणार" ही हेटाळणी "बाईंसारखं लिहून / बोलून दाखव आणि मग शेखी मिरव" अशी बदलली. असं करता करता काही महिने लोटले. दर वेळी घरी आली की शाळेतल्या मैत्रिणींकडे जाऊन ती आपला झालेला अभ्यास आणि त्यांचा झालेला अभ्यास यांची तुलना करायची. आपण आपल्या वर्गमित्रांच्या कितीतरी पटीने पुढे आहोत हे पाहिलं की तिच्या अंगावर रोमांच उभे रहायचे. आणि मग एक दिवस ती ज्या शाळेत शिकवायची त्या शाळेला एक नवी शिक्षिका मिळाली. आता लॉर्ना पुढचे शिक्षण घ्यायला मोकळी होती. आणि तिच्या हाताखाली काही महिन्यांमधे तिच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली होती. प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता तोंड देऊन संकटांचे डोंगर तिने हसत हसत पार केले होते. आणि या सगळ्याचं अगदी गोड असं बक्षीस तिला मिळालं. अल्बर्टने तिला मागणी घातली. घोडागाडीच्या चिमुकल्या प्रवासात दोघांच्याही मनात फुटलेले अस्फुट धुमारे नकळत प्रेमात परिवर्तित झाले होते. नाताळच्या आनंदात तिने अल्बर्टला होकार दिल्याच्या आनंदाची भर पडली. थाटामाटात लग्न लावायचे असे मोठ्या खर्चाचे अल्बर्टच्या आईचे बेत धाब्यावर बसवून एका शनिवारी संध्याकाळी दोघांनी लग्न केले. धर्मोपदेशक असलेल्या लॉर्नाच्या बाबांनी स्वतः त्यांचे लग्न लावले. तिचा वधूवेष तिच्या आईने स्वतः शिवला होता. तिचं आणिअल्बर्टचं घर खूप मोठं आणि लाकडी होतं. ते अल्बर्टने स्वतः बांधलं होतं आणि त्यातलं सामानसुमान लावून स्वयंपाकघर जय्यत तयार करायला तिने स्वतः त्याला मदत केली होती. आणि तिचे दिवस पालटले. तिच्या डोळ्यांसमोर नवीन संसाराची, उच्च शिक्षणाची सुखस्वप्ने होती. पण आता ती स्वप्ने हाताच्या अंतरावर होती. अळवाच्या पानावरच्या मोत्यांसारखी विरून जाणारी नव्हती. इतके दिवस जे कष्ट काढले त्यांच्या अश्रूतून जणू काही फुलांचा सडा सांडला होता. साऱ्या दुःखांचं वाळवंट पार करून लॉर्नाने नव्या सुखाच्या सुंदर प्रदेशात हसतमुखाने प्रवेश केला होता. सगळीकडे आनंदी आनंद झाला होता.
बस्स एवढीश्शी गोष्ट. त्यात कुठे भव्य राजमहाल नाहीत. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून दाखवलेली यश चोप्राच्या चित्रपटातल्यासारखी स्वप्नं नाहीत.निसर्ग आणि खडतर आर्थिक परिस्थिती सोडली तर कोणी खलनायकपण नाही. आजकाल चोहीकडे मांडलेला स्वप्नांचा मायाबाजार पाहून ही कथा अगदी सरळ साधी सोवळी वाटते. पण रोजरोज पंचतारांकित जेवण जेवल्यावर काही दिवसातच कंटाळा येतो. आणि मग साधी ताजी भाकरी किंवा गुरगुट्या भात हवाहवासा वाटायला लागतो. तसंच आहे हे पुस्तक. फार मोठ्या बाता न करणारं पण जीवनातल्या अमूल्य अशा मूल्यांचं महत्त्व पटवून देणारं...
याचं मूळ इंग्रजी पुस्तक कुठलं होतं हे काही मला आठवत नाहीये. कोणाला माहीत असलं तर सांगू शकाल का?
--अदिती(वरील गोषवारा माझ्या आठवणींवर विसंबून लिहिलेला आहे. हे पुस्तक वाचून मला जवळपास १० वर्षं झाली. त्यामुळे तपशिलात घोर चुका असल्या तरी उदार मनाने क्षमा करावी ही विनंती...)

Sunday, June 18, 2006

नर्मदेऽऽहर

श्री. जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेल्या स्वानुभवांवर आधारित नर्मदेऽऽऽहर या पुस्तकाबद्दल थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून लिहीत आहे. नुकतेच मी हे पुस्तक वाचून संपवले. अलिकडे म्हणजे ऑगस्ट २००५ मधे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कुंट्यांनी (लेखकाने असे न म्हणता कुंट्यांनी असे म्हणते आहे.) केवळ २० दिवसात ते एकहाती लिहून काढले आहे. पुस्तक अतिशय सुंदर आणि विलक्षण पकड घेणारे आहे,इथे सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की ज्यांना देव,धर्म,पाप,पुण्य,श्रद्धा इ. कल्पनांवर भरपूर वाद घालायला आवडते त्यांनी हे(पुस्तक सोडा , पण हा लेख सुद्धा!) न वाचलेले बरे. कारण कुंट्यांना आलेले अनेक अनुभव तर्काच्या-विज्ञानाच्या कसोटीवर अपासून बघणे अशक्य आहे. काही लोकांना तर ते दिवास्वप्न अर्थात हॅल्युसिनेशन वाटण्याचा संभव आहे. माझा स्वतःचा चमत्कारांवर विश्वास नाही. तरीही या पुस्तकात दिलेले अनुभव थक्क करून सोडतात हे खरे. तेव्हा एका वेगळ्या शक्यतेचा विचार करायला लावणारे आणि आपल्या भोवतालच्या चाकोरीबद्ध जगातून काही काळापुरती मुक्तता देणारे हे वेगळे अनुभव ज्यांने त्याने स्वतःच सत्यासत्यता ठरविण्यातले आहेत. (हे डिस्क्लेमर म्हणून धरायला हरकत नाही. कृपया माझ्यावर वाचकांच्या पत्रांची मारामारी नको!)
तर आता विषयाकडे वळू या. पुस्तकाच्या नावावरून लक्षात आलंच असेल की हे पुस्तक नर्मदा परिक्रमेवर आधारित आहे. सध्या नर्मदा म्हटली की सरदार सरोवर, नर्मदेकाठचे आदिवासी, त्त्यांचा संघर्ष, मेधा पाटकर इ. गोष्टी प्रकर्षाने आठवतात्. ही नर्मदा नदी अमरकंटक पर्वतात उगम पावते आणि भडोच अर्थात भृगुतीर्थाजवळ पश्चिम सागराला मिळते. तिच्याबद्दल नर्मदापुराणात अशी गोष्ट सांगितली जाते की तिचा विवाह शोण नावाच्या नदाशी होणार होता परंतू प्रत्यक्षात शोणाने तिच्या दासीशी लग्न लावले. त्यामुळे संतापून तिने अमरकंटक पर्वतावरून उडी फेकली आणि ती थेट समुद्रात जाऊन गुप्त झाली. अशी ही नर्मदा. तिला आज हजारो वर्षे लोक माता मानून तिची पूजा करत आले आहेत. शंकराचर्यांनी तिची अतिशय प्रासादिक अशी अष्टकं रचली आहेत. आणि ही लोकमाता सदैव एखाद्या जागृत दैवताप्रमाणे आपल्या भक्तांच्या रक्षणाला धावून जाते असा तिच्या भक्तांचा विश्वास आणि अनुभव सुद्धा आहे.या नर्मदेची परिक्रमा अतिशय अवघड आहे. तिला कोठेही न ओलांडता तिच्या काठाला उजव्या हाताला घेऊन निघायचे. वाटेत तिचे ओहोळ-नाले लागले तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांच्या उगमाच्या मागे जाऊन मग पुढे जायचे हा मुख्य नियम. वाटेत डोंगराळ प्रदेश, भीषण जंगले, हिंस्र श्वापदे, निसर्गाचा असमतोल इ. नैसर्गिक आपत्ती आणि जंगलातले लुटारू वगैरे इतर संकटे ही तर ठरलेलीच. त्यात या साधकाने कुठेही उच्चासनावर बसायचे नाही, कुठेही वस्ती करून फार काळ रहायचे नाही, अनवाणी जायचे, शक्यतो चालतच जायचे असे कठोर नियम. एकूणच हजारो जन्मांचे पापक्षालन करणारी ही परिक्रमा. परिक्रमा विधिवत् पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे ३ वर्षं, ३ महिने आणि १३ दिवस.कारण चातुर्मासात परिक्रमा निषिद्ध. पाऊस थांबेपर्यंत वाटेतच मुक्काम करायचा.जगन्नाथ कुंटे म्हणजे प्रसिद्ध संशोधक कृष्णमेघ कुंटे चे वडील. त्यांचा जन्म विलक्षण हालाखीच्या परिस्थितीत गेला आहे. लहानपणापासून कमालीचे दारिद्र्य आणि आध्यात्माची ओढ या दोनच गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आणि भोगलेल्या. कळायला लागल्यापासून हिमालयाची ओढ. तिथल्या एका गुहेचे सतत दर्शन त्यंना होत असे. वयाच्या आठव्या वर्षी कुंटे हिमालयात जायला म्हणून घरातून बाहेर पडले. त्यांची विधवा आई तेव्हा भिकारदास मारुतीच्या मंदिरात राहात असे. तेव्हा कुंट्यांना साताऱ्याला शंकर महाराजांच्या मठात प्रत्यक्ष शंकर महाराजांनी दर्शन दिले(या प्रसंगी शंकर महाराजांना समाधिस्थ होऊन बरीच वर्षे झाली होती असे कळले.) त्यानंतर अनेक सत्पुरुषांचा स्नेह आणि सद्गुरुंची कृपा कुंट्यांना लाभली. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. यामुळे ते ध्यानाला बसले की त्यांची कुंडलिनी जागृत होते आणि तिला हवे तसे सर्व प्रकारचे प्राणायम-ओंकार त्यांच्याकडून करून घेते. कुंट्यांना घरात राहूनही अध्यात्माणिची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणीची ओढ सतत आहे. यापूर्वीही बरेचदा ते मनात आलं की तीर्थक्षेत्री प्रवासाला गेले आहेत.त्यांना धानात गुरुंकडून आदेश मिळाला की परिक्रमा करून ये. आणि दोन दिवसात ते निघले परिक्रमेला. प्रत्यक्ष प्रवासाचे वर्णन त्यांच्याच भाषेत वाचावे. परिक्रमावासींना वाटेत लोक अन्न-पाणी-चहा-अंथरूण-ओपांघरुण अशी यथाशक्ती मदत करतात. त्यामुळे नित्यपाठाचे पुस्त, नम्रदामैय्याचा एक फोटो आणि थोडेसे प्रवासखर्चापुरते पैसे घेऊन कुंट्यांनी परिक्रमेला सुरुवात केली. वयाच्या साठीच्या आसपास असेल वय त्यांचं. पण चालण्याचा रेटा इतका अफाट की तरुण मुलं सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नसत. परिक्रमेत कुंट्यांना प्रचंड शारिरीक कष्टांना तोंड द्यावे लागले. पण नर्मदामैय्यावर सगळा भार त्यांनी सोपवला. आणित्यांच्या श्रद्धेचं फळ, सद्गुरुंची कृपा आणि आपल्या भक्तांवरची नर्मदेची अफाट माया यातलं काहेही कारण असेल पण त्यांना तिच्या कृपेची अनुभूती असंख्य वेळा मिळाली. एकदा पट्टेरी वाघ त्यांच्या शेजारून गेला. पण त्यांना काहीही झाले नाही. एक्दा चालताना पाय ठेचकाळून जखम झाली म्हणून त्यांना थांबावे लागले. समोर पाहिले तर त्यांना थांबावे लागण्याचे कारण कळले. समोर पिवळा जर्द नाग त्यांच्या पायाशी उभा होता. एकदा रात्री झोपेत त्यांच्या छातीवरुन असाच एक महानाग दोन वेळा सरपटत गेला. त्यांची भुकेची सोय करायला, त्यांना मार्गदर्शन करायला, त्यांच्या निवाऱ्याची काळजी करायला एवढंच नाही तर सिगारेटचा( त्यांच्या भाषेत करंटा) हट्ट पुरवायला, त्यांची पूजा स्वीकारायला नर्मदामाईने अनेक रूपांत त्यांना दर्शन दिले. त्यांचा सगळा भार त्यांनी तिच्यावर टाकलेला असल्याने आई जशी लहानग्याची काळजी घेते तशीच त्यांची काळजी तिने घेतली. एकदा त्यांना प्रचंड जुलाब झाले. उभं सुद्धा राहणं अशक्य झालं. तेव्हा ते रानात होते. पुढचा मुक्काम किंवा मनुष्यवस्ती १२ किलोमीटर लांब होती. त्या दिवशी शनिवार होता. त्यांनी मारुतीरायाची प्रार्थना केली की देवा वाटेवर ठेव मला. आणि आश्चर्य म्हणजे कुठून कसे ते गेले काही कळत नाही पण १२ किलोमीटर चे अंतर ते २ तासात अवघ्या २ किलोमीटर मधे चालून गेले.नदी पार करताना योग्य मार्ग सुचेना. नाकापर्यंत पाणी आले. तेव्हा त्यांनी नर्मदेचा धावा केला. नर्मदेने एका आदिवासी बालिकेच्या रूपात त्यांना दर्शन दिले आणि मार्ग दाखवला.एकापेक्षा जास्त वेळा त्यांना आडरानात भुकेच्या वेळी अन्न-निवारा मिळाला आणि त्या निवाऱ्यातून ते बाहेर पडताच त्या जागा अदृश्य झाल्या. पण तिथल्या लोकांनी दिलेल्या काही वस्तू आजही त्यांच्याकडे आहेत. चमत्कार वाचताना आपण अगदी आश्चर्यचकित होऊन जातो.सगळ्यात आश्चर्य वाटते ते त्यांची आणि अश्वत्थाम्याची भेट वाचताना. असे अनेक चमत्कार त्यांच्या संपूर्ण परिक्रमांमधून उलगडत जातात. कुंट्यांनी एकापाठोपाठ एक अशा तीन परिक्रमा केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा चमकार म्हणजे पहिली परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्यांनी उद्यापन केले तेव्हा एका वृद्ध माणसाच्या रूपात नर्मदामातेने त्यांना दर्शन दिले आणि पांढरे वस्त्र मागून घेतले हा प्रसंग वाचून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
जाता जाता ते सद्यस्थिती, भ्रष्ट शासन, प्रेमळ प्रामाणिक आदिवासी, स्वतः मुसलमान असून परिक्रमावासीला मायेने शिधा देणाऱ्या आणि त्यांच्याच आग्रहावरून तोच शिधा रांधून जेवायला वाढणाऱ्या माताजी, संन्यासाचा आव आणणारे भोंदू साधू, चांगल्या वाईटाची चांगली पारख असणारे सत्पुरुष,श्रीमंत आश्रमांमधून श्रीमंतांना मिळणारी व्हीआयपी वागणूक, परिक्रमेत मिळालेल्या गोष्टींचा व्यापार करणारे परिक्रमावासी, अंतरीच्या खुणा जाणणारे आणि उपदेश करून मार्ग दाखवून गुप्त होणारे स्वामी, क्षुद्र माणसे, ज्ञानी माणसे, भगवी वस्त्रे धारण करूनही स्वार्थ न सुटलेली माणसे, नर्मदामैय्याची उपासना मनोभावे करणारे आणि म्हणून परिक्रमावासीयांना घासातला घास काढून देणारे आदिवासी अशी माणसांची अनेक उदाहरणे इथे सापडतात. कुंट्यांच्या शब्दात त्यांच्या कुंडलिनीच्या जागृत अवस्थेतील वर्णन वाचावेच असे आहे. अध्यात्माचा मर्ग अतिशय निसरडा आहे आणि केवळ सद्गुरूची कृपा आणि स्वतःचा जागृत सद्सद्विवेक याच आधारांवर ही वाट चालावी लागते हे पुस्तक वाचून अगदी पटते. कुंत्यांनीच एकेठिकाणी लिहिलंय की हिमालयापेक्षाही नर्मदा-अमरकंटक प्राचीन आहेत. आणि अतिप्राचीन काळापासून नर्मदा परिक्रमेची ही पद्धत चालत आलेली आहे. त्यामुळे अनादिकालापासून चालत आलेले ही परंपरा आणि नर्मदेची खरी मुले असे तिथले आदिवासी यांचं अद्भुत असं साम्राज्य आपल्या मनात उभं राहतं. आजच्या काळात इतके जाज्ज्वल्य चमत्कार आणि तेही एकाच माणसाला अनुभवायला मिळणं हे दुर्मिळ आहे. आणि कुंट्यांनी अगदी सहज सोप्या भाषेत हे सगळं लिहिलं आहे. ते वाचून माअला जी शांती मिळते ती अवर्णनीय आहे. कुंटे सध्या चौथ्या परिक्रमेत मग्न आहेत. मलाही एक दिवस परिक्रमेला जायला निश्चित आवडेल. कोणी आहे का उत्सुक माझ्याबरोबर यायला......
--अदिती

Saturday, June 17, 2006

माझेही बुकटॅगिंग...

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
माणसे अरभाट आणि चिल्लर - जी. ए. कुलकर्णी
२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
जीएंच्या भाषाशैलीबद्दल काय लिहू? मला त्यांनी अगदी भारावून - मोहून टाकले आहे. रोजच्या वापरातले शब्द सुद्धा एखाद्या कुशल जादूगाराच्या परिसस्पर्शाने कसे वेगळ्याच उंचीवर जाऊन उभे ठाकतात हे पाहताना थक्क व्हायला होते. विचार तर इतके सॉलिड आहेत की मेंदूला मुंग्या येतात. त्या मुखपृष्टावरच्या अनेक पिंपळपानासारखं मनही एक पिंपळपान ओऊन त्याच पुस्तकाच्या अवकाशात गरगरत राहतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे. मी काही जीएंची डाय हार्ड फॅन नाही.. खरं म्हणजे मी वाचलेलं त्यांचं हे एकमेव पुस्तक आहे. पण त्यातल्या शब्दांच्या मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या खेळामुळे माझा जीएंबद्दलचा आदर शतपटीने वढला आहे हे मात्र खरं.शाळेत असताना बाईंनी त्यातला 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' चा किस्सा सांगितला होता ... तो उल्लेख, तो पायथागोरसचा सिद्धान्त आणि देवाने दिलेले ते पुण्याअच्या गणितातले दशांश चिन्ह हे मनावर कायमचे कोरले गेलेले काही प्रसंग.
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
पाडस - (अनुवाद) राम पटवर्धन
चौघीजणी - (अनुवाद) शांता शेळके
उत्खनन - गौरी देशपांडे
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
व्यासपर्व दुर्गाबाई भागवत
४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
बापलेकी
इडली ऑर्किड आणि मी
एक झाड दोन पक्षी
इजिप्तायन
चित्रमय स्वगत
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
एक होता कार्व्हर
वीणा गवाणकरांचं हे पुस्तक मला अक्षरशः संस्कारक्षम वयात सापडलं. शाळेत असताना दिसलं पुस्तक की वाचून काढ असा सपाटा लावला होता मी. पण माझ्या बाईंचं मी काय वाअते आहे याकडे बारीक लक्ष असायचं. वर्गाच्या छोट्याश्या ग्रंथालयातून हे पुस्तक मला मिळालं आअणि ते वाचून मी जी थरारून गेले म्हणता... छोट्या कार्व्हरची ती गोष्ट वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याची थोरवी, साधेपणा, मनाचा निर्मळपणा आणि अनेक दैवी गुणांचा त्याच्या ठिकाणी असलेला तो समुच्चय पाहिल्यानंतर त्याची ती असीम नम्रता आणि निगर्वी वृत्ती म्हणजे फळांनी लगडलेल्या वृक्षराजाची खाली झुकण्याची वृत्ती हे अगदी पटलं मला. आजही त्याचं पुस्तक घेऊन बसले आणि कुठलंही पान काढून काही ओळी जरी वचल्या तरी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. नतमस्तक होण्यासारख्या किती जागा देवाने निर्माण केल्या आहेत हे पाहिलं की या जगाचा पसारा नक्की कोणत्या डोलाऱ्यावर उभा आहे हा प्रश्न पडायचा बंद होतो...

Saturday, June 10, 2006

काही पुस्तकांबद्दल थोडेसे

पु. ल. , शिवाजी सावंत, रणजीत देसाई,श्री. ना .पेंडसे , भा. रा. भागवत इ. प्रथितयश लेखकांची पुस्तके वाचायला मला नेहेमीच खूप आवडतं आणि त्यांच्या पुस्तकांना मोठा वाचकवर्ग लाभलेला असल्यामुळे या पुस्तकांबद्दल नेहेमीच चर्चा होत असते. पण आडबाजूला कोपऱ्यात असणाऱ्या किंवा वेगळ्या विषयावरच्या पुस्तकांबद्दलही मला तितकाच जिव्हाळा वाटतो. त्यातली ही काही रत्नं...

१.धूळपाटी :
शांता शेळकेशांताबाईंचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. हे रूढ आत्मचरित्र नाही पण शैक्षणिक जीवनाचे मनोरम चित्र रेखाटणारे हे पुस्तक मला अतिशय आवडते. शांताबाईंची एका वनखात्यातल्या अधिकाऱ्याची परकरी मुलगी या रूपातून 'शांता शेळके' या रूपापर्यंतच्या प्रवासातली जडणघडण, त्यातले कडू-गोड टप्पे , बालसुलभ सुख दुःख, कौटुंबिक आघात-प्रेम इ. घटनांच्या पार्श्वभूमीवर हे कथन पुढे पुढे जाते. शांताबाईंच्या साहित्यिक 'असण्याचा' एक अतिशय सुंदर आलेख इथे वाचायला मिळतो. कॉन्व्हेन्ट शाळेत सरदारांच्या मुलींबरोबर केवळ शिक्षणाची लालसा बघून त्यांना मिळालेला प्रवेश, ती शाळा, तिथले ते प्रशस्त ग्रंथालय, ते इंग्रजीचे तास, ती आमराई, ते एकूणच संस्कारक्षम आणि प्रसन्न वातावरण, वाचनाची त्यांना लागलेली गोडी , नंतर महाविद्यालयीन जीवन, संस्कृत सारख्या विषयाबद्दल निर्माण झालेली आत्मीयता, ते शिक्षक, तो भारलेला काळ, उत्तररामचरिताच्या अभ्यासासाठी जागून काढलेल्या संस्मरणीय रात्री आणि बरेच काही संदर्भ, उल्लेख त्यांच्या सरळ साध्या ओघवत्या शैलीत वाचताना आपल्यालाही अनुभवावेसे वाटतात. अगदी सरळ साधं हृद्गत असं आईच्या हातच्या पदार्थासारखं पुढे येतं आणि क्षणात आपलंसं करून टाकतं. (या सगळ्याला माझ्या व्यक्तिगत आनंदाची एक किनार जोडली जाते कारण यात वर्णन केलेल्या शाळेची आणि महाविद्यालयाची मी स्वतः विद्यार्थिनी आहे. तो अभिमानाचा रंग नकळत यात मिसळला जातो. )अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे. जरूर वाचावं असं आहे.
२. तोत्तोचान :
तेत्सुको कुरोयानेगी (अनुवाद चेतना सरदेशमुख-गोसावी)दुसऱ्या महायुद्धातील नागासाकीच्या दुर्दैवी बाँबहल्ल्यात जिचा दुर्दैवी अंत झाला अशा एका अनोख्या शाळेची गोष्ट यात आहे. बालवाडीतून विक्षिप्त वर्तनाबद्दल काढून टाकलेल्या तोत्तोचान या मुलीला आत्मसन्मानाने जगायला शिकवणारी तोमोई ही ती शाळा. या तोत्तोचान नेच मोठेपणी तिचे लाडके कोबायाशी सर आणि त्यांच्या शिक्षणक्षेत्रातल्या या आगळ्या प्रयोगाची कथा लिहिली आणि ती जगभर लोकप्रिय झाली. तेत्सुको कुरोयानेगी यांना युनेस्को च्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करायचा सन्मान या पुस्तकामुळे मिळाला. हे पुस्तक विलक्षण आहे आणि लहान तोत्तोचाअच्या मनोविश्वाशी समरस होऊन लिहिलं आहे. कोबायाशी गुरुजींची ही जरा वेगळ्या पद्धतीची शाळा जिथे शिस्तीचा बाऊ न केला जाताही मुलांना चांगल्या-वाईटाची समज येत असे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. रस्त्यावरून जाणाऱ्या बँडवाल्यांची वाट पहात वर्गाच्या खिडकीशी उभी राहणारी चिमुरडी तोत्तोचान आणि तिच्यात सहज होत जाणारे बदल वाचताना मन आनंदाने भरून जातं. प्रत्येक मुलाकडे स्वतंत्रपणे लक्ष देणारे कोबायाशी मला तरी थक्क करून सोडतात. मुलांच्या शर्यतीत एक प्रकार फक्त एका अपंग मुलालाच करता येईल असा ठेऊन त्याला गरज पडली तर त्याच्या नकळत एक 'लिफ्ट' देणारे कोबायाशी मला अंतर्मुख करून जातात. प्रत्यक्षच वाचावं असं हे पुस्तक. अधिक प्रसंग इथे सांगून रसभंग करणार नाही मी पण हे पुस्तक चटका लावून जातं हे मात्र खरं...
३. टोकियोच्या प्रांगणातील चमकत्या तारका :
भाषांतरकर्तीचं नाव अत्ता मला आठवत नाही पण एका ब्रिटिश पत्रकर्तीने जपानमधल्या वास्तव्यातील निरीक्षणांवरून विसाव्या शतकातील पाच जपानी स्त्रियांबद्दल लिहिले आहे. जपानी समाजाच्या बदलत्या स्पंदनांचे चित्रण तर यात आहेच पण आपल्या कलाविष्कारांमधे आणि कलावंताला सततच ज्याची आस असते अशा स्वतःच्या शोधामधे रमू पाहणाऱ्या-रमणाऱ्या किंवा ती आस लागूनही ते न करू शकणाऱ्या या स्त्रियांच्या या कहाण्या मला माझ्या विश्वाच्या परिघाबाहेरच्या आणि विलक्षण वाटल्या. या स्त्रियांमधे एक कवयित्री, दोन अभिनेत्री, एक नटी, एक चित्रकार अशा विविध स्तरांवरच्या स्त्रिया आहेत. आणि त्यांची भावविश्व, त्यांची पार्श्वभूमी, त्यांना वेढून असणारा समाज हाही भिन्न आहे. वेगळं,कसदार आणि घालवलेल्या वेळाची चांगली परतफेड करणारं असं हे पुस्तक मला तरी वाटलं. विशेषतः शिको या कवयित्रीच्या आयुष्याची दुर्दैवी कहाणी मला खिन्न करून गेली. प्रांत-भाषा-समाज बदलला तरी स्त्रियांच्या कहाण्या त्याच बंधनांनी, त्याच कर्तव्यांच्या बेड्यांनी बांधलेल्या असतात याचा एक उदासवाण प्रत्यय मला या पुस्तकातून आला.
४. '!चीपर बाय द डझन' :
मूळ लेखन ऍन गिलब्रेथ-कॅरे व तिचा भाऊ(बहुधा फ्रँक आहे त्याचं नाव मूळ लेखकांची नावे चुकण्याचा संभव आहे चूभूदेघे!) अनुवाद मंगला निगुड्कर. आपल्याला सहा मुले आणि सहा मुली अशी एकूण बारा मुलं व्हावीत अशी इच्छा असणाऱ्या आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलेल्या एका अमेरिकन ज्यू माणसाची ही कथा. बारा मुलं का या प्रश्नाचं उत्तर 'चीपर बाय द डझन' असं ते देत असत. त्यांच्या एका मुलीने आणि मुलाने मिळून हे चरित्र लिहिलं आहे. फ्रँक गिलब्रेथ हे कुठलंही काम अतिशय तीव्र गतीने कसं करता येईल या विषयातले तज्ञ होते. लोकविलक्षण अशी तीव्र बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. त्यांच्या मरणानंतर त्यांचा मेंदू त्यांच्या इच्छेने प्रयोगशाळेत अभ्यासासाठी दिला गेला. त्यांनी आपल्या डझनभर मुलांना कसे वाढवले याची ही अतिशय प्रसन्न अशी कथा आहे. मुलांना टंकलेखन यंत्र शिकवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या युक्त्या तर अप्रतिम आहेत. नेहेमीच्या परिघाला टँजंट जाणारे हे अनुभव वाचताना रंगून जायला होतं. आई बाळंतपणाला गेल्याअवर बाबा आणि इतर मुलांनी घर कसे चालवले,बारा मुले एकदम गाडीत बसल्यावर काय काय गंमती होत, वाढत्या वयाच्या मुलांची काळजी बाबा कशी घेत असत, खट्याळ आणि खोड्याळ मुलांच्या डांबरटपणाला आई-बाबा मिळून कसे तोंड देत असत वगैरे तपशील तर विलक्षण मनोरंजक आणि प्रसंगी हास्यस्फोटक आहेत. माझ्या 'वाचलीच पाहिजेत अशा' पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचे स्थान वरचे आहे.
अजून बऱ्याच पुस्तकांबद्दल लिहायला मला आवडेल. पाहू या आता ते कधी होतंय लिहून ते....
--अदिती